मुंबई : ‘जळगाव व सांगली–मिरज-कुपवाड महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेले जबरदस्त यश म्हणजे जनतेने विकासाला दिलेला कौल आहे. या विजयाबद्दल मी मतदारांचे आभार मानतो आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो,’ अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे यांनी शुक्रवारी (तीन ऑगस्ट २०१८) व्यक्त केली.
दानवे म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार यांचे काम जनतेला पसंत पडले आहे. जनतेला विकास हवा आहे. मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश वेगाने विकास करत आहे. त्यामुळेच राज्यात सातत्याने महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये जनतेने भाजपला पाठिंबा दिला आहे. जनता विकासाच्या मुद्द्यालाच पाठिंबा देते हे आजच्या निकालावरून दिसून आले.’